मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

meditation full videos

राजयोग मेडीटेशन साठी खालील लिंक ओपन करा ....
http://video।google.com/videoplay?docid=-9169988705166643872&hl=en#docid=-1598822156629596409

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

जनुकीय आजारांचे प्रसूतिपूर्व निदान

माझ्याकडे 1 जोडपं त्यांचे नवजात अर्भक घेऊन आले होते. त्या बाळाची तपासणी व चाचण्यांतून, त्याला डाऊन सिन्ड्रोम हा जनुकीय आजार असल्याचे स्पष्ट झाले.
आता माझ्यापुढे मोठ्या जिकिरीचे काम होते. त्या पालकांना, तुमच्या बाळाला या गुणसूत्रांच्या आजारामुळे, मानसिक व शारीरिक व्याधी होण्याची शक्‍यता आहे, ही वाईट वार्ता द्यायची होती. हे ऐकल्यावर नुकत्याच मिळालेल्या आनंदावर विरजण पडते व त्या पालकांची अवस्था अतिशय केविलवाणी होते. हे कसं शक्‍य आहे, आम्ही नियमित डॉक्‍टरांकडे जाऊन तपासण्या केल्या, सोनोग्राफीही केली, अशी ते स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. माझ्या हातात मात्र त्या क्षणी थोडा दिलासा देण्याव्यतिरिक्त काहीच उरत नाही.

या जोडप्याच्या घरामध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारचा आजार नाही. जनुकीय आजार तर सोडाच. तरीदेखील त्यांच्या बाळामध्ये हा "जनुकीय' आजार कसा झाला, हा विचार साहजिकच त्यांच्याप्रमाणे तुमच्याही मनात डोकावला असेलच. कारण जनुकीय आजार म्हटला, तर घरात कुणालातरी हा आजार असायलाच हवा, असा अनेकांचा समज असतो. खरंतर हा एक मोठा गैरसमज आहे; कारण गुणसूत्रांचे आजार हे बहुतांश वेळा जरी जनुकीय असले तरीही आनुवंशिक नसतात. त्यामुळे जरी पूर्वीच्या पिढ्या रोगमुक्त असल्या तरीही हे आजार येणाऱ्या पिढीत होण्याची शक्‍यता असते.

आता अशा प्रकारच्या आजारांचे उगम लक्षात घेण्याकरिता आपण थेट त्या अवस्थेकडे जाऊ या, की जिथे जीवनाचे समग्र रहस्य केवळ एका पेशीमध्ये दडवून निसर्गाने ते गर्भपिशवीत रोवले आहे. ती पेशी म्हणजे शुक्राणू व स्त्रीबीजापासून तयार झालेलं भ्रूण. या एका पेशीमध्ये संपूर्ण मानव शरीर बनवण्याची क्षमता असते. गर्भधारणेच्या २७० दिवसांच्या कालावधीत या एका पेशीतून अब्जावधी पेशी तयार होतात, ज्यांचे विविध अवयवांत रूपांतर होते. अव्याहत चाललेला हा पेशींचा कारखानाच म्हणा हवे तर. प्रत्येक पेशीचे दुभाजन होऊन दोन, अशा प्रकारे पेशी वाढत जातात. प्रत्येक विभाजनाच्या वेळी पेशींतील द्रव्य पदार्थांचे व जनुकीय सूत्रांचेदेखील विभाजन होते. या अगणित वेळा होणाऱ्या विभाजनांमधून काही चुका झाल्या नाहीत तरच नवल. परंतु, निसर्ग सहसा अशा चुका घडू देत नाही. चुका झाल्याच तर एक अत्यंत काटेकोर अशी रिपेअर प्रणाली एकतर त्या चुका दुरुस्त करते किंवा त्या पेशींना मारून तरी टाकते. परंतु, जसजसे स्त्रीचे व ओघाने स्त्रीबीजाचे वय वाढत जाते, तसतसे या चुका होण्याचं प्रमाण वाढतं व रिपेअर प्रणाली पण काहीशी निकामी होते. यामुळे जनुकीय असमतोल होतो व जनुकीय आजार उद्‌भवू शकतो. याआधी सांगितलेल्या डाऊन सिंड्रोम या आजारात २१ नंबरच्या गुणसूत्राचा असमतोल होतो व दोनऐवजी तीन २१ नंबरची गुणसूत्रे प्रत्येक पेशीमध्ये जातात.

बहुतांश वेळा जनुकीय असमतोल असलेले गर्भ आपल्या आपणच गळून पडतात; अर्थात गर्भपात होतो. परंतु काही प्रसंगी असे गर्भ वाढतातदेखील व त्या वेळेस मात्र मानसिक व शारीरिक अपंगत्व असलेलं मूल जन्माला येण्याची शक्‍यता असते. आता आपल्या लक्षात आले असेलच, की जरी आनुवंशिकता नसली तरीसुद्धा गुणसूत्रांचे आजार होऊ शकतात. हे आजार होण्याचे प्रमाण स्त्रीच्या वाढत्या वयाबरोबर वाढत जाते. असे असले तरीदेखील लहानवयीन गर्भवती मातांच्या गर्भामध्येही हे गुणसूत्रांचे आजार होऊ शकतात. किंबहुना जर आपण आकडेवारी पाहिली तर ३० वर्षांखालील स्त्रियांच्या बाळांमध्येच हे आजार बहुतांश वेळा झाल्याचे आढळते.

हल्लीच्या एक मूल कुटुंबसंस्थेत, होणारे मूल सुदृढ व निरोगी व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी विविध चाचण्याही केल्या जातात. परंतु, बऱ्याचदा गुणसूत्रांच्या आजाराची शक्‍यता वर्तविणाऱ्या चाचण्या मात्र केल्या जात नाहीत. गुणसूत्रांच्या आजारांची काही विशिष्ट लक्षणे असतात, जी गर्भामध्ये साधारण १० आठवड्यापासून दिसू लागतात. मातेच्या रक्तातले काही घटकपदार्थ व काही विशिष्ट प्रकारच्या सोनोग्राफी करून गर्भामध्ये गुणसूत्राचे आजार होण्याची शक्‍यता वर्तवली जाऊ शकते.

पहिल्या तिमाहीत म्हणजे अंदाजे ११-१३ आठवड्यांदरम्यान आईच्या रक्तातील दोन घटक रसायनं याला "डबल टेस्ट' असेदेखील म्हणतात. याच दरम्यान न्यूकल ट्रान्सलूसेन्सीची मोजणीही महत्त्वाची असते. न्यूकल ट्रान्सलूसेन्सी हे बाळाच्या मानेच्या मागे असलेले एक अर्धपारदर्शक आवरण असते. सोनोग्राफीवर या आवरणाची जाडी मोजली जाते व गुणसूत्रांचा आजार असल्यास ही जाडी वाढली असल्याचे आढळते. डबल टेस्ट व एनटी या दोन्ही चाचण्या महत्त्वाच्या, पण अतिशय सुलभ आहेत व दोन्ही एकाच बैठकीत करता येतात. या दोन्ही चाचण्या मिळून खात्रीशीररीत्या जनुकीय गुणसूत्रांच्या आजारांच्या शक्‍यतेचा निर्वाळा करता येतो. जर ११-१३ आठवड्यांदरम्यान डबल टेस्ट व एनटी करणे शक्‍य झाले नाही तरीही १५-२० आठवड्यांच्यामध्ये "ट्रिपल टेस्ट' करून वरीलप्रमाणेच गुणसूत्रांचे आजार नसल्याची खात्री करून घेता येते. या चाचणीत तीन घटक मोजले जातात म्हणूनच याला ट्रिपल टेस्ट असे संबोधतात. या ट्रिपल टेस्टचा आणखी एक फायदा असतो. यातील एएफपी हे घटक बाळामध्ये होणाऱ्या मज्जारज्जूंच्या काही आजारांविषयी कल्पना देते.

वरील चाचण्यांव्यतिरिक्त गर्भजल काढून त्यामधील गुणसूत्रांची मांडणी, अर्थात कॅरयोटाइपिंग करूनदेखील या आजारांचे निश्‍चित निदान करता येते. दोनपेक्षा अधिक वेळा कोणत्याही कारणाविना जर गर्भपात झाले असतील तर जोडप्याने जनुकीय चाचण्या व सल्ला घेणं हितावह ठरते. मातृत्व हा स्त्रीजीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो, तसेच तिच्या गर्भात वाढणारी ती लहान पावले उद्या घरभर धावून सर्वांनाच आनंद देणार असतात, स्वप्न व साकार करणार असतात. पण वरीलप्रमाणे काही अकल्पित प्रकार घडल्यास साऱ्यांचा विरस होऊ शकतो. काही अगदी सोप्या चाचण्या करून गुणसूत्रांचे जनुकीय आजार टाळता येऊ शकतात.

डॉ. चैतन्य दातार

वैद्यक जनुकशास्त्र तज्ज्ञ, पुणे.

घरोघरी असाव्यात अशा वनस्पती

वने-उपवने नगरांची शोभा वाढवतात. अंगणातील बगीचा घराला प्रतिष्ठाही देतो; पण वृक्षवल्ली केवळ शोभेसाठी नसतात.
बहुगुणी वनस्पतींचे घराच्या आसपासचे अस्तित्व मनुष्याला आरोग्य देते. म्हणूनच गच्चीत कुंडीत का होईना झाडे वाढवली पाहिजेत. आपल्याबरोबर झाडे वाढवली पाहिजेत. ती शुद्ध हवा देतील. डोळ्यांना शांती देतील. आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींवर हाताशी आयते औषध पुरवतील.

प्राचीन भारतात नगर असो वा घर असो, बागेशिवाय पूर्ण होत नसे. नंदनवन, अशोकवन, इंद्रप्रस्थातील उपवन अशा अनेक बाग-बगीच्यांचे उल्लेख भारतीय साहित्यात सापडतात. घराच्या गच्चीत वा घराशेजारी बाग असणे हे आजही प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. प्रत्येक घरात किमान तुळशीचे छोटे रोपटे तरी असतेच.

तुळशीच्या बरोबरीने अजूनही काही वनस्पती अशा आहेत, की त्या घरोघरी असाव्यात. छोट्याशा कुंडीतही सहज लागतील, वेळेवर पाणी दिले, तर चांगल्या प्रकारे वाढतील आणि लहानसहान तक्रारींवर इलाज करण्यासाठी हाताशी असतील अशा काही वनस्पतींची माहिती आज आपण करून घेणार आहोत. तुळस - आपल्या नुसत्या अस्तित्वानेही उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींमध्ये अग्रणी ठरावी अशी ही वनस्पती. तुळशीच्या आसपासची हवा शुद्ध राहत असल्याने घरात तुळस असणे हे आरोग्यप्रद समजले जाते.

तुळशीची दोन - तीन पाने रोजच्या चहात टाकल्याने एकंदर रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहून, सर्दी-खोकला-ताप किंवा यांसारख्या साथीच्या रोगांना प्रतिबंध होताना दिसतो.

खोकला झाल्यावरही तुळशीचा अर्धा चमचा रस मधासह घेतल्याने बरे वाटते. सर्दीवरही तुळशीचा काढा पिण्याने बरे वाटते.

नायट्यासारख्या कंड सुटणाऱ्या त्वचारोगांवर तुळशीच्या पानांचा रस चोळण्याने कंड कमी होण्यास मदत मिळते.

कोरफड - कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.

शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.

कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.

याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.

गवती चहा - गवती चहा कुंडीतही सहज येतो. रोजच्या चहात गवती चहाच्या ताच्या पातीचे कात्रीने तुकडे करून टाकले असता चहा स्वादिष्ट बनतो. चहापत्ती न टाकता नुसता गवती चहाचा चहासुद्धा अतिशय रुचकर असतो. असा चहा तापामध्ये फार हितकर असतो. गवती चहा, सुंठ व खडीसाखर यांचा कडक चहा घेऊन जाड पांघरूण घेऊन झोपले असता घाम येऊन ताप, थंडी वाजणे कमी होते. सर्दी, पडसे, घसा दुखणे, ताप यांसारख्या तक्रारींवर गवती चहा, आले, दालचिनी, पुदिना यांचा काढा घेण्यानेही बरे वाटते. गवती चहाचा काढा घेतला असता लघवी साफ होण्यासाठी मदत मिळते.

पुदिना - पुदिन्याच्या नुसत्या काड्या कुंडीत लावल्या तरी पुदिना फोफावतो. पुदिना पाचक असतो. अरुची नष्ट करतो व गॅस, पोटदुखी वगैरे त्रासांवर उपयुक्‍त असतो.

गॅसमुळे पोट फुगून दुखत असल्यास अर्धा चमचा पुदिन्याच्या रसात अर्धा चमचा आल्याचा रस, चवीनुसार जिरे पूड व काळे मीठ घालून घेतल्यास बरे वाटते.

तोंडाला चव नसल्यास पुदिन्याची ताजी पाने कापून त्यावर थोडेसे लिंबू व सैंधव टाकून जेवण्यापूर्वी खाण्याने बरे वाटते.

आले, पुदिना, गवती चहा यांच्यापासून बनविलेला हर्बल चहा घेण्याने पचन व्यवस्थित राहते. विशेषतः हिवाळ्यात व पावसाळ्यात काहीतरी गरम पेय घ्यावेसे वाटते अशा वेळी साध्या चहाऐवजी असा हर्बल चहा घेणे चांगले असते.

कढीपत्ता - थोड्या मोठ्या कुंडीत कढीपत्त्याचे साधारण उंचीचे झाड लावता येते. जमिनीत तर कढीपत्त्याचे झाड चांगलेच वाढते. कढीपत्त्याच्या झाडाच्या आसपासची हवा शुद्ध असते असे समजले जाते. तोंडाची चव बिघडली असता, अन्नास रुची वाटत नसल्यास कढीपत्त्याची चार - पाच पाने चावण्याने व नंतर थुंकून टाकल्याने तोंड स्वच्छ होते, रुचीयुक्‍त होते.

अंगावर कोळी वा तत्सम कीडा चिरडला गेल्यामुळे त्या ठिकाणी आग होऊ असली, खाज सुटत असली, तर त्या ठिकाणी कढीपत्त्याची पाने चुरून चोळल्याने बरे वाटते.

अडुळसा - अडुळशाचे छोटे झुडूप असते; पण जराशा मोठ्या कुंडीतही अडुळसा वाढतो. अडुळशाचे पिकलेले पान खोकल्यासाठी विशेष उपयुक्‍त असते. अडुळशाची पिकलेली दोन - तीन पाने, ज्येष्ठमध, काळी द्राक्षे यांचा काढा साखर टाकून घोट घोट घेण्याने आराम पडतो. अडुळशाच्या पानांचा रस मधात मिसळून वारंवार चाटल्याने कफ सुटा व्हायला मदत मिळते, घसा मोकळा होतो व बरे वाटते. नाकातून रक्‍त येत असल्यास डोक्‍यावर अडुळशाच्या पानांचा लेप करण्याचा फायदा होतो. स्त्रियांमध्ये पाळीच्या दिवसांत अति प्रमाणात रक्‍तस्राव होत असल्यास अडुळशाच्या पानांचा रस मधाबरोबर घेण्याने बरे वाटते.

ओव्याची पाने - या पानांना एक छान सुगंध असतो; तसेच ही पाने पाचक असतात. भूक लागत नसल्यास जेवणाअगोदर ओव्याचे पान चावून खाण्याचा उपयोग होतो. ओव्याच्या पानांची चटणी पचनास मदत करते.

लहान मुलांना सर्दी, खोकला झाला असता ओव्याच्या पानांचा रस काढून मधासह थोडा थोडा दिला असता आराम मिळतो.

ओव्याची पाने किंचित गरम करून छाती-पाठीवर शेक करण्याने लहान मुलांचा खोकल्याचा त्रास कमी होतो. ओव्याच्या पानांची भजी करण्याची पद्धत आहे.

रुई - रुईचे झाड रानोमाळ कुठेही उगवते. त्यामुळे ते सहसा कुंडीत लावले जात नाही; पण रुई कुंडीतही चांगली उगवते. घराच्या आवारात रुईचे एखादे तरी झाड लावावे.

लहान मुलांचे पोट वायूने फुगले असता पोटाला तेल लावून रुईच्या पानाला थोडे तेल लावून गरम करून शेक दिला असता पोट ओसरते. याने पोट दुखणेही कमी होते.

खोकला-दम्याच्या त्रासावरही छाती-पाठीला रुईच्या पानांचा शेक करण्याने पटकन बरे वाटते.

अशा प्रकारे फार मोठी जागा नसली, तरी कुंड्यांमधून या प्रकारे वनस्पती लावता येतात व साध्या साध्या त्रासांवर उपयोगी ठरू शकतात.

डॉ. श्री बालाजी तांबे