मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

सोमवार, २७ एप्रिल, २००९

हृदयविकार - नरेंद्र गोळे यांचे लेख

हृदयविकार - नरेंद्र गोळे यांचे लेख

हृदयविकारः १-झटका का येतो?


शरीर निकास करू शकते त्यापेक्षा जास्त, मेदयुक्त पदार्थ सतत खात राहिल्यास, शरीर त्यांची विल्हेवाट लावू शकत नाही. त्यामुळे त्यांचे साठे शरीरात साचू लागतात. धमनीच्या भींतींवर मेदाची पुटे चढतात. ह्या पुटांना धमनी अस्तर म्हणतात. हृदयधमनीत अशाप्रकारे साचणाऱ्या सांख्यांमुळे धमनीची रुंदी कमी होते.

धमनी अस्तर जर पुरेसे कठीण नसेल तर कधीकधी पुंजक्यांच्या स्वरूपात सुटते आणि रक्तात उतरते. अडचणीच्या ठिकाणी, म्हणजे निरुंद झालेल्या हृदयधमनीत जाऊन तिला आणखीनच निरूंद करते.

जखम झाल्यास ती त्वरीत बंद व्हावी म्हणून शरीररचनेतच रक्ताला साखळण्याचा गुणधर्म दिलेला असतो. मात्र शरीरांतर्गत जखमांच्या प्रकरणात रक्त साखळल्यास त्याची गुठळी होते. अशी गुठळी अडचणीच्या ठिकाणी, म्हणजे निरुंद झालेल्या हृदयधमनीत जाऊन तिला आणखीनच निरूंद करते.

आपले स्नायू सतत आकुंचन-प्रसरण पावतच असतात. मात्र अनेकदा ते मनोव्यापारांवर अवलंबूनही आक्रसतात. त्याचप्रमाणे धमन्याही आक्रसतात. उदाहरणार्थ, समजा गाडी सुटते आहे तेंव्हा ती पकडण्याची निकड शरीरात अनेक घडामोडी घडविते. त्यातीलच एक म्हणजे हृदय धमनीचे आक्रसणे. ह्याला धमनीआकष म्हणतात। निरुंद झालेल्या हृदयधमनीत, धमनीअस्तर सुटून लोंबकळत आहे, काही कारणांनी निर्माण झालेली रक्तगुठळी येऊन ठेपलेली आहे अशाच अवघडलेल्या क्षणी जर काही कारणाने रुग्णाच्या मनात तीव्र घडामोडी घडल्या (तणाव उत्पन्न झाले) तर धमनीआकष होतो. आणि उरलीसुरली हृदयधमनी पूर्णतः बंद होऊन हृदयविकाराचा झटका येतो.


हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना

आपण सारेच हा प्राणघातक आजार बाळगत असतो. आपले हृदय कितपत प्रभावित झालेले आहे याची आपल्याला कल्पना नसते. आणि मग आपण आपल्या शरीराने दिलेल्या पूर्वसंकेतांकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरतो. याकरता हे जाणणे आवश्यक असते की हृदयाघाताच्या पूर्वसूचना काय असतात.

आपले नेहमीचे काम करीत असतांनाही आपल्याला थकवा जाणवतो. आजूबाजूचे सर्व लोक आपआपली कर्तव्ये यथासांग बजावत असतांना उगाचच 'थकलो बुवा' असे म्हणत नाहीत. मात्र आपल्यालाच थकवा वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

व्यायामानंतर, परिश्रमांनंतर, उत्तेजनेनंतर अथवा रागावल्यावर श्वास घेण्यास त्रास जाणवतो. अपुरी श्वसनक्षमता हे हृदयविकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

शारीरिक श्रमांनंतर आणि खाल्ल्यानंतर छातीत अस्वस्थता जाणवते. तिच्याकडे दुर्लक्ष करू नये.

छातीच्या मध्यावर वेदना सुरू होते. ती डाव्या हाताकडे व कधीकधी उजव्या हाताकडे पसरत जाते. चालल्यावर डाव्या हाताकडे व पाठीकडे पसरत जाणारी वेदना जाणवते. ह्या वेदनेस हृदयशूळ (अन्जायना पेन) म्हणतात. पोटातील वातामुळेही अशी वेदना जाणवू शकते. मात्र ही वेदना काही खाल्यावर, प्यायल्यावर अथवा थोडेसे चालल्यावर कमी होऊ शकते. खाल्यावर, प्यायल्यावर अथवा थोडेसे चालल्यावर हृदयशूळ मात्र वाढू शकतो. अर्ध्या तासापर्यंत जर वेदना शमली नाही, तर ती हृदयशूळ असण्याची शक्यता दाट असते.

हृदयाघात अगदी नजीकच्या भविष्यात येऊन ठेपलेला असेल तर दरदरून घाम सुटतो (आंघोळ घतल्यागत), प्रचंड थकवा जाणवतो. श्रम केल्यास हृदयशूळ वाढतो. परसाकडची भावनाही होऊ शकते. मात्र अशावेळी क्षणाचाही विलंब करू नये. वैद्यकीय मदत मिळवावी. डॉक्टर धमनीविस्फारक औषधे देऊन रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला देतात.

एकदा हृदयाघात झाला तर दरम्यानच्या काळात हृदयस्नायूच्या ज्या भागास रक्तपुरवठा बंद पडतो तो भाग कायमचा मरण पावू शकतो। म्हणून अर्ध्या तासाच्या आत तातडीच्या मदतीची गरज असते.


हृदयविकारः ३-श्वसनक्षमता संवर्धन

इतर रोगांमध्ये जसे स्टेथोस्कोप छातीवर लावून निदान करतात, त्याउलट हृदयविकारात पाठीवर स्टेथोस्कोप लावून श्वसनक्षमतेचे निदान करतात. श्वसनक्षमता ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये १५ टक्केपर्यंत असू शकते, सामान्य लोकांत ती पाच ते दहा टक्के असते तर हृदयरुग्णांमध्ये ती २.५ टक्क्यांपर्यंत घटलेली सापडते.

कापडी टेपने छातीत पूर्णपणे श्वास भरून घेऊन छातीचा घेर मोजावा. समजा तो 'भ' सेंटीमीटर आहे. कापडी टेपनेच छातीतील उच्छवास पूर्णपणे निष्कासित करून छातीचा घेर मोजावा. समजा तो 'र' सेंटीमीटर आहे. तर भ उणा र भागिले र ह्या संख्येस शंभरने गुणल्यास टक्क्यांमध्ये श्वसनशक्ती मिळते.

ही श्वसनशक्ती कुणीही, कधीही मोजू शकतो. ती वाढवावी. वाढल्याची नोंद ठेवावी. असे नेहमी केल्यास अवनतीकारक रोग आसपासही फिरकणार नाहीत.

श्वसनशक्ती कशी वाढवावी? उत्तरः प्राणायामाने. योगासनांनी. व्यायामाने. मात्र हे सारे करण्याचे प्रयोजन श्वसनशक्ती वाढविणे हे असले पाहिजे.

३० अधिक वयात छातीचा पिंजरा पूर्णपणे तयार झालेला असतांना श्वसनशक्ती वाढते कशी? तर आपण छाती जास्त फुगवून अधिक प्राण भरून घेऊ शकत नसलो तरीही छाती पूर्णपणे रिकामी करून अंतरंगातील साठलेला कर्बद्विप्राणिद पूर्णपणे निष्कासित करण्यात यशस्वी होतो। आपली छाती जास्त मोकळी होऊ लागते. आणि श्वसनशक्ती वाढू शकते. हेच साधण्याचा भरकस प्रयत्न करावा.


हृदयविकारः ४-रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे हृदयविकाराचे कारण आहे की उच्च रक्तदाब हृदयविकाराचे पर्यवसान आहे, हा वाद 'अंडे आधी की कोंबडी आधी' असा आहे. मात्र दोघांचाही परस्परांशी घनिष्ट संबंध आहे. आणि हेही खरेच की आपल्या आजकालच्या बैठ्या, श्रमविहीन, खाद्यविपूल राहणीमानामुळे ह्या दोहोंचा जन्म होतो. म्हणूनच विशेषतः सदरहू वर्णनाचे जीवनमान धारण करणाऱ्या ३० अधिक वयाच्या प्रत्येकाने वर्षातून किमान चारदा आपला रक्तदाब वैद्यकीय व्यक्तीकडून मोजून घ्यावा आणि त्याची तपशीलवार नोंद ठेवावी.

निरोगी माणसाचा सामान्य रक्तदाब कुठल्याही वयात, प्राणभरीत रक्त हृदयातून बाहेर टाकतानांचा दाब (systolic pressure) १२० मिलीमीटर तर अपानमिश्रीत रक्त हृदयात खेचतांनाचा दाब (diastolic) ८० मिलीमीटर पारा पातळी इतका असतो. तो १२०/८० असा लिहीतात. हल्ली १३०/९० रक्तदाब आढळल्यास 'तो तुमच्या वयासाठी (४० वर्षे) सामान्य आहे' अशा प्रकारची वाक्ये ऐकू येतात, ती सर्वथैव निराधार आहेत. वयोमानानुसार हृदयधमन्यांमध्ये कीटण साठून धमनी काठीण्य येते. धमन्या प्रत्यास्थ (इलॅस्टीक) राहत नाहीत, व कीटणामुळे अरुंदही झालेल्या असतात. म्हणून त्यांमधून रक्त ढकलण्यासाठी हृदयास जास्त दाबाने रक्त ढकलावे लागते. हेही रक्तदाब वाढण्याचे एक कारण असते. मात्र, आवश्यक तेवढाच निरामय आहार घेणाऱ्या निरोगी माणसात वयपरत्वेही धमन्या प्रत्यास्थच राहतात आणि कीटण चढून अरुंदही होत नाहीत. म्हणून अशा लोकांत रक्तदाब कोणत्याही वयात १२०/८० असाच राहतो. आपलाही तेवढाच राहावा असा आपण आग्रह धरावा. मात्र ह्यासाठी औषधांचा, शस्त्रक्रियांचा आग्रह धरून उपयोग होत नाही. योग्य त्या 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाने' हे निश्चित रूपाने साधता येते. त्या शैलीबाबत संपूर्ण चर्चा आपण यथावकाश करणारच आहोत.

हल्ली १३०/९० रक्तदाबास दखलपात्र न समजण्याची प्रथा आहे. १४०/१०० झालेला आढळल्यास 'उच्च रक्तदाब' आहे असे मानून तो कमी करण्यासाठी औषधे देतात. १६०/१०० वा त्याहून अधिक असल्यास रुग्णालयात भरती करून, धमनी विस्फारक औषधे देऊन त्वरीत उतरवतात. नंतर रक्तदाब कमी करणारी औषधे व मेदविदारक (कोलेस्टेरॉल कमी करणारी) औषधेही सुरू करतात. याहूनही रक्तदाब वाढतांना दिसला तर विद्युत हृदयालेख (ECG: electro cardio gram) काढण्यास सांगतात. त्यात संशय गडद झाल्यास ताणचाचणी (stress test) करवतात. इथे निर्णय होतो तो तुम्हाला हृदयधमनीविकार (IHD: Ischemic Heart Disease) आहे की नाही त्याचा. तो असल्यास हृदयधमनीआलेखन (Angiography) करवतात. ह्या चाचणीत हृदयाच्या तीन प्रमुख धमन्यात असलेले अडथळे पाहता येतात. ते ७० टक्क्यांहून अधिक असल्यास हृदयधमनीरुंदीकरण (Angioplasty) अथवा हृदयधमनीउल्लंघन (Bypass) करण्याचा सल्ला दिला जातो.

इथवर पोहोचूनही मनुष्य वैद्यकाच्या कचाट्यातून मुक्त सुटू शकतो. जर गंभीर अडथळा नसेल तर याऊपरही माणुस विनाऔषध, विनाशस्त्रक्रिया पूर्ववत निरोगी होऊ शकतो. 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाने'. कसा ते आपण यथावकाश पाहूच.

उच्च रक्तदाब शारीरिक, मानसिक, आनुवांशिक अशा अनेक कारणांनी निर्माण होत असला तरी निवळ रक्तदाब मोजल्याने त्यामागचे कारण समजत नाही. तसेच, तो किती काळपासून तसा असावा याचे निदान येत नाही. ते जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. त्याविषयीही वेगळ्याने लिहायचे आहे.

उच्च रक्तदाब दीर्घकाळ बाळगल्याने मेंदूतील रक्तवाहिन्या क्षीण होऊन पक्षाघात होऊ शकतो. हृदयधमन्या अरुंद होऊन हृदयाघात येऊ शकतो. हृदयाचा आकारच वाढू शकतो. डोळ्यांच्या रक्तपुरवठ्यास क्षती पोहोचून दृष्टी उणावू शकते. मूत्रपिंडे खराब होऊ शकतात. हे सर्व हानीकारक प्रभाव प्रत्यक्षात घडलेले आहेत अथवा नाही ते नक्की करण्यासाठीही विविध चाचण्या केल्या जातात. त्यांचेविषयीही स्वतंत्रपणे लिहायचे आहे.

मात्र, 'सम्यक जीवनशैली परिवर्तना' व्यतिरिक्त कशानेही प्राथमिक (ज्याचे कारण वैद्यकीयदृष्ट्या नक्की झालेले नाही असा) उच्च रक्तदाब सामान्य होऊन, कायम सामान्यच राहू शकत नाही। औषधाने तो केवळ तात्पुरता (औषधाचा प्रभाव असेपर्यंत म्हणजे बहुधा २४ तास, त्यानंतर पुन्हा औषध घ्यावे लागते) नियंत्रणात ठेवतात. हे उमजून घेतल्यास उच्च रक्तदाबाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आमुलाग्र बदलेल, ह्यात काय संशय?


हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा

उच्च रक्तदाब हा सुप्त, प्रगतीशील आणि प्राणघातक विकार समजल्या जातो.

सुप्त या अर्थाने की त्याची लक्षणे शरीरावर दिसू लागतात तोपर्यंत तो आहे अशी शंकाही रुणाला अथवा त्याच्या नातेवाईकांना येत नाही. स्वतः काही बोलू नये असे वाटणे, इतरांनीही फार बोलू नये असे वाटणे, साध्या साध्या आवाजांची कलकल सहन न होणे, चिडचिड होणे अशी कारणे हळूहळू प्रकट होऊ लागतात. मात्र पावलांवर सूज येणे, प्रचंड थकवा, श्वसनहीनता जाणवणे ही प्रगत लक्षणे दिसू लागेपर्यंत रक्तदाब खूपच (१६०/१००) वाढलेला असू शकतो.

प्रगतीशील या अर्थाने की एकदा वाढू लागलेला रक्तदाब 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाव्यतिरिक्त' इतर उपायांनी (म्हणजे रक्तदाब कमी करणाऱ्या गोळ्यांनी) क्वचितच नियंत्रणात येतो. दिसामासी वाढतच राहतो. कारण शरीरावर त्याच्या उत्सर्जक शक्तीबाहेर टाकलेला खाद्यपदार्थांचा भार. विशेषतः तेल, तूप, साखर आणि मीठ यांचा.

प्राणघातक यासाठी की असाच अनियंत्रित वाढू दिल्यास रक्तदाबाने अचानक मृत्यू संभवतो.

रक्तदाब शरीरात किती दिवसांपासून, महिन्यांपासून अथवा वर्षांपासून ठाण मांडून बसलेला आहे याचे निदान आवश्यक असते. मग करायला सांगतात रक्ततपासणी. रक्तातील मेदाची रूपरेषा (लिपीड प्रोफाईल).

रक्तात तीन प्रकारची कोलेस्टेरॉल आढळतात. चांगलीः उच्च सघन लिपो प्रथिने (गुडः हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन्स), वाईटः कमी सघन लिपो प्रथिने (बॅडः लो डेन्सिटी लिपो प्रोटीन्स) आणि ओंगळः ट्रायग्लिसेराईडस् (अग्लीः ट्रायग्लिसेराईडस्, ह्यांना ओंगळ म्हटलेले आहे कारण ती सूक्ष्मदर्शकाखाली ओंगळ, कुरूप दिसतात). चांगली कोलेस्टेरॉल बदाम, आळशी इत्यादींपासून मिळतात. इतर सर्व तेले, तूप इत्यादी अपायकारक सदरात मोडतात. साखरेपासून मानसिक तणावाच्या परिस्थितीत शरीर, ओंगळ लिपोप्रथिने तयार करते, ज्यांमुळे हृदयधमनीविकार बळावतो. ही कोलेस्टेरॉल मिलीग्रॅम टक्क्यांमध्ये मोजतात. चांगलीः ३०-६० असतात, जेवढी जास्त तेवढी चांगली. वाईटः १९० पर्यंत असतात, जेवढी कमी तेवढी चांगली. ओंगळः ६०-१६० असतात, जेवढी कमी तेवढी चांगली.

शरीरातील कोलेस्टेरॉलच्या ७५ टक्के कोलेस्टेरॉल शरीरच तयार करते. कच्चा माल म्हणजे शरीरात खाद्यपदार्थातून येणारी, व विल्हेवाट लावण्यास कठीण असलेली साखर. तेव्हा 'मला मधुमेह आहे का असे विचारू नका'. साखर त्वरीत कमी करा. हल्लीच्या आपल्या आहारात साखरेचा वापर खूपच जास्त झालेला आहे.

रक्तात गुठळ्या होण्यास पोषक वातावरण म्हणजे रक्त दाट असणे, होणे। तेव्हा विनाऔषध, रक्त पातळ ठेवणारा आहारच पत्करा. काळ्या मनुका रक्त पातळ करतात. सकाळी त्या थोड्याशा जरूर खाव्यात.


हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव

निराश झालेल्यास हिंदीत अशी तसल्ली देतात की 'दिल छोटा न करो'. मात्र उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाच्या हृदयाचा आकारच त्या दाबाने वाढतो आणि तो रुग्ण 'दिल बडा' करून बसतो. पण ही स्थिती वस्तुतः निराशाजनक असते. कारण मोठे हृदय मोठ्या रक्तप्रवाहास आणि त्यानुषंगाने आलेल्या थकव्यास कारणीभूत ठरते. द्विमितीय प्रतिध्वनी चाचणीने (टू डी. इको टेस्टने) ह्याचा शोध घेतात.

उच्च रक्तदाबाचा मूत्रपिंडांवरील प्रभाव शोधण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करतात. दोन्हीही मूत्रपिंडे खराब झाल्यास सारखे रक्तबदल (डायलिसिस) किंवा मूत्रपिंडबदल शस्त्रक्रिया करावी लागते. ही सारीच प्रक्रिया मनस्तापाची, खर्चिक आणि संसर्गप्रवण असते.

उच्च रक्तदाबाचा बुबुळांवरील प्रभाव फंडुस्कोपी नावाच्या चाचणीने हुडकतात.

उच्च रक्तदाबाचा रक्ताभिसरणावरील प्रभाव विद्युत हृदयालेखाने तपासतात. रक्तातील मेदाच्या रूपरेषेने निश्चित करतात. हृदयधमनीतील अडथळे ताणचाचणी आणि हृदयधमनी आलेखनाने स्पष्ट होतात.

उच्च रक्तदाब शरीराच्या असंख्य चयापचयांशी जवळून निगडीत असल्याने, त्याचे असणे म्हणजे शरीरात कली शिरला असावा तसे आहे।


हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष


हृदयविकार असतो तेव्हा आपण स्वस्थ नसतो. म्हणजे स्वस्थ असणे हे आपले इप्सित असायला हवे. मग आपल्याला स्वस्थता कशी मोजतात ते माहीत असायला हवे.

एकाला विचारले की तू पौष्टिक आहार घेतोस का? तर तो म्हणाला 'हो. नेहमीच'. मग त्याला विचारले की तुला पौष्टिक म्हणजे काय ते माहीत आहे का? तर त्याने उत्तर दिले 'नाही'. आपली अवस्था नेहमी बहुधा अशीच असते. म्हणूनच स्वस्थतेच्या निकषांचा हा प्रपंच.

मानवी शरीराच्या स्वस्थतेचे ढोबळमानाने तीन निकष मानल्या जातात.

१. विश्रांत अवस्थेतील हृदयस्पंदनदर कमीत कमी असणे. हृदयस्पंदनदर मनगटातील, मानेच्या बाजूने डोक्याकडे जाणाऱ्या किंवा मांडीतील धमनीवर बोटे ठेवून मोजतात. पुरूषांमध्ये सामान्यतः ७२ स्पंदने दर मिनिटास तर स्त्रियांमध्ये त्याहून जास्त आढळतो. विश्रांत अवस्थेतील हृदयस्पंदनदर जेवढा कमी असेल तेवढीच प्रकृती स्वस्थ. आयुष्य दीर्घ.

२. परिश्रमाने हृदयस्पंदनदर वाढतो. वाढायलाच हवा. मात्र त्यानंतर श्रम थांबतात तेव्हा तो पूर्ववत होतो, त्यावेळी किती लवकर तो पूर्ववत होतो त्यावर स्वस्थता अवलंबून असते. जेवढा लवकर हृदयस्पंदनदर पूर्ववत होऊ शकेल तेवढी स्वस्थता अधिक.

३. एकूण कार्यक्षमता. माणूस किती वेगाने, किती काम, किती वेळ करू शकतो त्याने त्याची एकूण कार्यक्षमता ठरते. माणसाने कामाची गती, परिश्रमाचे परिमाण अथवा परिश्रमकाल यांपैकी काहीही किंवा सगळेच वाढविल्यास हृदयस्पंदनदर वाढत जातो. मग माणूस 'थकलो' म्हणून निवृत्ती पत्करतो. हृदयस्पंदनदर किती वाढत जातो त्याला मर्यादा असते. माणूस थकतो त्यानंतरही तो काम करत राहू शकतो. मात्र लवकरच तो अंतीम मर्यादा गाठतो. तिही ओलांडून एकूण कार्य वाढवतच नेणारा उरस्फोट होऊन मृत्यू पावतो. त्यावेळी तो जो हृदयस्पंदनदर गाठतो त्यास अंतीम हृदयस्पंदनदर मर्यादा म्हणतात. प्रत्येक व्यक्तीसाठी ही मर्यादा जाणून घेण्याचा एक ठोकताळा आहे. २२० उणा तुमचे वय म्हणजेच तुमची अंतीम हृदयस्पंदनदर मर्यादा. साधारणपणे ह्या मर्यादेचा ७०-८० टक्के हृदयस्पंदनदर गाठल्यावर मनुष्य थकलो म्हणतो. मात्र, चुकूनही त्याने अंतीम मर्यादेच्या ९० टक्क्यांहून अधिक काम करू नये.

तेव्हा कमीत कमी विश्रांत हृदयस्पंदनदर, परिश्रम थांबविल्यानंतर लवकरात लवकर पूर्ववत हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता आणि एकूण जास्तीत जास्त काम करता येणे यावरून तुमची स्वस्थता ठरते। ती वाढवत नेणे हाच प्राणायाम, योगसाधना आणि व्यायामाचा उद्देश असायला हवा. अर्थातच जो स्वस्थता उंचावेल तो अवनतीकारक विकारांपासून निःसंशय आणि नक्कीच दूर जाईल. तेव्हा हे साधण्याचा आटोकाट प्रयत्न करा!


हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली

'योग-एक जीवनशैली' हे नाव आहे एका पुस्तकाचे ज्याचे लेखक आहेत डॉ. नंदकुमार गोळे. मात्र 'तो' मी नव्हेच. ते मात्र स्वतः डॉक्टर असण्यासोबत योगशिक्षकही आहेत. मी जेव्हा योगाची माहिती शोधत होतो, तेव्हा योगाबाबत शास्त्रीय माहिती असलेली अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यातील दोन पुस्तके निकम गुरूजींच्या अंबिका योग कुटिर ची आणि दोन जनार्दनस्वामींच्या योगाभ्यासी मंडळाची होती. ही पुस्तके योगाभ्यासी गुरूकुलांची होती. मात्र मला, डॉक्टर असून योगशिक्षक झालेल्या गोळ्यांच्या पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मी ते वाचले आणि मला जाणवले ते हे, की मला हवी तशी शास्त्रीय माहिती त्यात उत्तम रीतीने दिलेली आहे. आपणही ती अवश्य वाचा. योग आणि व्यायाम एकच नाहीत. योगात रक्तदाब कमी होतो तर तो व्यायामात वाढतो. ह्याचे सविस्तर निरुपण त्यांनी ह्या पुस्तकात केलेले आहे. अवश्य वाचावे.

हठयोग म्हणजे काय? माझा तर आता आतापर्यंत असाच समज होता की कुठे अंगठ्यावर उभे राहून तपश्चर्या कर, कुठे वायू भक्षण करून जग असली खडतर व्रते म्हणजेच हठयोग असावा. मात्र, 'ह' म्हणजे सूर्य आणि 'ठ' म्हणजे चंद्र. सूर्यचंद्र, दिवसरात्र, प्राणअपान, धनऋण इत्यादी द्विस्तरीय प्रणालींमध्ये जग वाटल्या गेलेले असते. त्या दोन्ही स्तरांतील संतुलन साधणे म्हणजे 'हठयोग' असे निकम गुरूजींच्या पुस्तकात सांगितलेले आहे. जीवनातील द्वैतात अद्वैत शोधण्याचे काम निकम गुरूजींनी फारच सोपे करून सांगितलेले आहे. ते पुस्तक आपण मुळातच वाचावे.

प.पू‍. जनार्दनस्वामींच्या पुस्तकातील सूर्यनमस्कार मला सर्वात शास्त्रशुद्ध वाटले. त्यातील इतरही सांघिक आसने करून पाहण्यासारखी आहेत. लहानपणी स्वतः जनार्दनस्वामींच्या मार्गदर्शनाखाली सांघिक आसने करण्याचे सौभाग्य मला अनेकदा लाभले. मात्र त्यावेळी मला तो जुलुमाचा रामराम वाटे. झडझडून धावपळ करण्याचा अवखळ वयात, सावकाश हातवारे करण्याने काही साध्य होईल असे मला मुळीच वाटे ना. पुढे त्यांचे 'योगस्वरूप' नावाचे पुस्तक मोठेपणी वाचल्यावर मात्र माझी मते बदलली.

ज्या 'सम्यक जीवनशैली परिवर्तना' बाबत मी सतत लिहीत आहे, त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे योगसाधना। हृदयविकारनिवारणार्थ आजकाल प्रत्येक प्रगत उपचाऱप्रणाली मग ती उपखंडीय असो वा अपूर्व (पाश्चिमात्य) योगास उच्च कोटीचे साधन मानते. हृदयोपचाराचा एक भाग म्हणून त्याचा उपयोग करण्याआधी योग स्वतःहून काय आहे ते जाणून घेणे आवश्यक वाटल्याने हा योगाच्या समर्थनाचा प्रपंच केला आहे. योग म्हणजे आपल्या संस्कृतीची संपत्ती आहे. आपल्याकडे पुस्तकप्रदर्शनांमध्ये योगावरील पुस्तकांचे ढीग सापडतात. जरूर वाचावेत. आपण योगाच्या पालनासाठी आणि संवर्धनासाठी वेळ खर्च केल्यास आपले आयुरारोग्य वाढेल ह्यात काय संशय?


हृदयविकारः ९-

ताणचाचणी सकारात्मक आली. ती हृदयधमनीतील अडथळ्यांकडे संकेत करीत असल्याचे सांगण्यात आले. हृदयधमनीआलेखन करून घेण्याचा सल्ला दिल्या गेला. ते केल्या गेले. डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत एकच अडथळा होता. ७० टक्के धमनीला व्यापून टाकणारा. तो त्याच शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. डॉक्टरांची ख्याती एवढी जबर होती की मला आणि नातेवाईकांना वेगळा विचार करण्याची आवश्यकताच वाटली नाही. त्यांचा सल्ला मानून तो अडथळा लगेच काढून टाकण्यात आला. तिथे कलंकहीन पोलादाचा १६ मिलीमीटर लांबीचा व २.२५ मिलीमीटर व्यासाचा, औषधवेष्टित विस्फारकही बसविण्यात आला. एका दिवसानंतर मला घरी सोडण्यात आले.

मग मला हे कळले की हृदयधमनी रुंदीकरण झाल्यानंतर, पुन्हा अडथळे होण्याचा धोका टाळण्याकरीता जन्मभर औषधे घ्यावी लागतात. त्यानंतर समजले की ती औषधे रु.७५०/- दरमहा याहूनही महाग असतात. आणि उर्वरित आयुष्यात माणूस लक्षावधी रुपये औषधकंपन्यांना बिनबोभाट देतो. हे औषधांच्या दावणीला बांधलेले आयुष्य आणि हृदयाघाताचा कायमच असणारा धोका यांपासून सोडवणूक करून घेणे हे माझ्या जीवनाचे प्रथम कर्तव्य झाले.

यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. आमच्या रुग्णालयात मला असेही सांगण्यात आले की रक्तदाब जर असाच राहिला तर औषधे वाढवून द्यावी लागतील.

दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच, कधीच, काहीही वाईट केलेले सोडाच पण चिंतिलेलेही नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? आता हृदयधमनी शस्त्रक्रिया तर झाली, मग रक्तदाब आदर्शवत १२०/८० का होत नाही? माझा रक्तदाब कशाने कमी होईल? हृदयधमनीत बसवलेला विस्फारक (stent), गरज संपल्यावर काढून टाकता येतो का? विस्फारकाचे आयुष्य किती असते? एक आणि अनेक.

त्यानंतरचे अनेक दिवस मी अक्षरशः निकरानी उपायांचा शोध घेण्यात घालविले. यापुढील कोणतीही ताणचाचणी नकारात्मक यावी आणि उर्वरित आयुष्य औषधविरहित जगता यावे हीच दोन प्रमुख उद्दिष्टे मी ठरविली. ही खरोखरीच साध्य आहेत का, हे मला माहीत नव्हते.

लोक भेटायला येत. नाना प्रकारचे उपाय सुचवित. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे मुळीच नसत. उलट ते; फिरायला जात जा (इथे उपजीविकेपाठी बांधलेले मध्यमवर्गीय जीवन वाट्याला आलेले आहे, नाही तर सकाळ-संध्याकाळ, बायकामुलांसकट, कुत्रा हाताशी धरून, बागबगीचे फिरलो असतो), व्यायाम करा (अहो, हे सारे करायला अतिरिक्त वेळ कुठून आणू?), प्राणायाम करा (निवांत श्वासोच्छवास करत बसायला, इथे वेळ कुणाला आहे?), दुधीचा रस प्या (दर दिवसाआड आम्ही दुधीचीच तर भाजी खातो की हो, मग तर मला हृदयविकार होऊच नये!), तणाव बाळगू नका (मला काय तणाव बाळगायची हौस आहे?), संतापू नका (लोक संताप आणतात!), आराम करा (आणि माझी कामे कोण तुम्ही करणार?), अशा प्रकारचे सल्ले जरूर देत.

माझ्या याआधीच्या दिनःचर्येत मला ते सारे साधण्यास मुळीच वेळ मिळत नव्हता, म्हणून तर ही परिस्थिती उद्भवली ना? मग आता मला झालेला आजार, माझी झालेली शस्त्रक्रिया, औषधयोजनेमुळे बांधल्या गेलेला माझा आहार ह्या साऱ्यांच्या उपस्थितीत मी त्यांच्या सल्ल्यांचा उपयोग कसा करू शकणार होतो, ते मला समजत नव्हते. भेटीला येणारे माझेच जवळचे सुहृद असत, नातेवाईक असत. त्याना माझ्या आरोग्याबाबत वाटणारी काळजी खरी असे. हेतू प्रामाणिक असल्याचीही माझी खात्री असे. ते सांगत असलेल्या उपायांनी, लोक बरे होत असल्याचे दाखलेही ते देत असत. माझी प्रतिक्रिया मात्र वर कंसात दिल्याप्रमाणे, त्या उपायांवर अविश्वास दाखविणारी आणि नकारात्मकच असे. ते सल्ले मला परस्परविरोधी वाटत. निरर्थक वाटत. माझ्या खऱ्या प्रश्नाची उत्तरे त्या उपायांनी कधीच मिळणार नाहीत, असा माझा समज झाला होता. मला माझ्या उद्दिष्टांकडे नेणारा उपाय दिसेना!

योगासने आणि रोग निवारण -

योगासने आणि रोग निवारण -

yogasan

WD
योगासनाने शरीरात उर्जा वाढतेच तसेच ती नियमित केल्याने विविध आजारांवर देखील नियंत्रण ठेवता येते. आजारानुसार त्यांच्यावर उपयोगी आसने खालीलप्रमाणे-
* एसिडीटीसारख्या पित्ताच्या आजारावर शलभासन, नाडी शोधन, शीतळी शितकरी आणि प्लविनी प्राणायामाने फायदा होतो.
* निद्रानाशावर- सर्वांगासन, सूर्यभेदी प्राणायाम, शीतली शीतकरी व योगनिद्रेचा फार फायदा होतो.
* पोटाच्या विकारात सर्वांगासन, बध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन, सर्पासन, चक्रासन, मत्स्येद्रासन, उंटासन व पोटाचे व्यायाम लाभदायी ठरतात.
* कंबरदुखीसाठी- पाठीच्या कण्याचे व्यायाम, योगक्रिया, सुखासन, पद्‍मासन, त्रिकोणासन, उत्कटासन, अर्धमत्स्येद्रासन, गोमुखासन, वज्रासन, सुप्‍तवज्रासन, मत्स्यासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, एकपाद, शंक्खासन, नौकासन गुणकारी आहेत. पाठदुखीवरही या आसनांचा उपयोग होऊ शकतो.
* बध्दकोष्टतेसाठी- शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, चक्रासन, भुजंगासन, अर्धत्स्येद्रासन, उष्टासन, हलासन, सर्वांगासन ही आसने करावीत. अथवा डावी नाकपुडी बंद करून उजवी मोकळी ठेवा. मुलबंध बांधून 100 पावले चाला. (शौचाची क्रिया रोखण्यासाठी स्थिती) किंवा चार ग्लास पाणी पिऊन ताडासन, स्कंधासन, तिर्थक भुजंगासन, शंखासन आदी आसनांच्या दररोज एक एक आवृत्ती कराव्यात
* करपट ढेकरांवर सर्वांगासन, ‍शीर्षासन, जानुशिरासन, भुजंगासन, चक्रासन, बध्दपद्‍मासन, उष्टासन, कर्णपिडासन आदी आसने उपयुक्त आहेत. यापैकी सर्वांगासन व ‍शीर्षासन अधिक लाभदायी आहेत. तात्काळ फायदा होण्यासाठी मत्स्यासन, अर्धमत्स्यासन, उर्ध्वपद्‍माससारख्या आसनांचा अभ्यास करावा.
* कातडीचे विकार दूर करण्यासाठी प्रार्थनेबरोबरच शंखपद्‍मासन व नाडीशोधन करावे.
* मांडी तसेच जांगेतील आजारांसाठी सर्वांगासन, जानुशिरासन, पश्चिमोत्तासन, अर्धमच्छेंद्रासन, सूर्यभेदी प्राणायाम नेतीजलनेती करावी तसेच वरील आसन अधुनमधून करत राहिल्यास सर्दीपासून संरक्षण मिळते.
* सुरकुत्यांवर कर्णी योगमुद्रा, शवासन, योगक्रियांचा उपयोग होतो.
* तीव्र रक्तादाबावर वज्रासन, पवनमुक्तासन, शशांकासनाबरोबर शीतली, शीतकरी आणि भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. शवासनानेही ताण, थकवा दूर झाल्याने रक्त दाब आटोक्यात येतो.
* दमा तसेच श्वासाच्या आजारावर शवासन, मत्स्यासन, शलभासन, सुप्‍तवज्रासन, भुजंगासन, उष्ट्रासन, शंखपक्षालन, भस्त्रिका, कपालभाती, उज्जाई प्राणायाम प्राणप्रयोग यांचा उपयोग होतो.
* नाक, कान व घशाच्या विकारावर सिंहासन, मत्स्यसनाबरोबर जलनेती प्राणायाम व यौगिक क्रिया उपयोगी आहेत.
* जुलाबावर सर्वांगासन, हलासनाबरोबर मुलबंध कार्योत्सर्गँ शितली प्राणायाम करावेत.

ND
* पचनासाठी पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन, उडियानासन, वज्रासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू शकतात.
* पोटदुखीवर उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वज्रासन, मच्छेद्रासन, भुजंगासन, उडियान योगमुद्रा रेचन करावे.
* पायांसाठी पद्‍मवीरासन, पर्वतासन, महावीरासन, अर्धबध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन व योगक्रिया कराव्यात.
* बहिरेपणासाठी- सिंहासन, शीर्षासनाबरोबर भ्रामरी प्राणायाम नेतीक्रिया, यौगिक क्रिया कराव्यात.
* हातासाठी धनुरासन, बकासन, चक्रासन, उर्ध्वपद्‍मासन, हस्तभुजासन, कुक्कुटासन, वज्रासन, लोलासन फार उपयोगी ठरतात.
* मधुमेहासाठी इष्टवंदन, हलासन, सर्वांगासन, जानुशीरासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, अर्धमच्छेंद्रासन, सुप्‍तवज्रासन, शशांकासन, गोमुखासन, ताडासन, योगमुद्रासन, मुलबंध बांधुन भस्त्रिका भ्रामरी नाडी शोधन शीतकरी आणि शितली प्राणायाम करावे.
* जाडेपणा कमी करण्यासाठी धनुरासन, पश्चिमोत्तासऩ सर्वांगासन, त्रिकोणासन, हलासन, शलभासन, अर्धमच्छेंद्रासन, पादहस्तासन, योगमुद्रेबरोबर, उडियान आणि नाडी शोधन प्राणायाम, योगिक क्रिया व मेरूदंडाचे व्यायाम करावे.
* यकृतदोषांवर - पश्चिमोत्तासन, शलभासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन, भुजंगासन, बध्दपद्‍मासन, शशांकासन, हस्तपादोत्तानासन, उष्ट्रासनाबरोबर वीर वंदन किंवा परमेष्टी वंदानाने अधिक लाभ होतात.
* रक्ताच्या कमतरतेवर- सर्वांगासन, हलासन, शलभासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, नाडी शोधन प्राणायाम व शितली प्राणायामाने रक्तशुध्दी व रक्तवृध्दीस लाभ होतो. कमी रक्तदाबावरही योगासनामुळे नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी वज्रासन, योगमुद्रा हकली आसने आणि नाडी शोधन कायोत्सर्ग यासारखी आसने करावीत.
* स्लिपडिस्क - नौकासन, धनुरासन, शलभासन, भुजंगासन व मकरासनाने अधिक लाभ होऊ शकतो.
* सुज आल्यास- शरीरावर सुज आलेल्या भागाच्या आतल्या नसांना ताणणारे प्रकार लाभदायक ठरतात. उर्ध्वसर्वंगासन व शीर्षासन यामुळे सुज येण्याची प्रक्रिया कमी होते.
* तोतरे बोलण्यावर नौकासन, सिंहासन, उत्थितपद्‍मासनाबरोबर शीतकरी, शितली आणि भ्रामरी प्राणायामाने तोतरेपणा कमी होतो.

योगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या!

योगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या!








yoga

ND
* योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
* त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्‍यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.

* लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल.

* कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

* सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.

* रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे.

* अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते.

* योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.

* लक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणार्‍यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा
आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.

रविवार, २६ एप्रिल, २००९