मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

बुधवार, ३० डिसेंबर, २००९

कुशाग्र बुध्दी साठी - Dr. Santosh Jalukar

‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्या साठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशा वेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनां पैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, व्यायामाचे महत्व काय, देवपूजा किंवा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे, ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य नेमके कसे होते, ग्रहण केलेले ज्ञान कशा प्रकारे साठवले जाते, ते आठवण्याची क्रिया नेमकी कशी होते, ह्या व अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनाला रोज भेडसावत असतील. ह्या सर्व शंकांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया.

तीन स्टेप प्रोग्रॅम:

ज्ञान ग्रहण करण्यासाठी शरीर पाच ज्ञानेंद्रियांचा प्रामुख्याने उपयोग करते. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अशा पाच इंद्रियांना पंचज्ञानेंद्रिय म्हणतात. ह्या इंद्रियांमुळे मेंदू पर्यंत ज्ञान संवेदना पोचविण्याचे कार्य शरीर सहज करू शकते. हे काम योग्य प्रकारे होण्यासाठी ही पाचही इंद्रिये स्वच्छ, तंदुरुस्त व त्यांच्या माध्यमाने संवेदना वहन करण्यासाठी असलेल्या नाड्या (Nerves) योग्य प्रकारे स्निग्धता युक्त (properly lubricated) असणे आवश्यक आहे. सर्दी झाली की वास येत नाही हे अगदी नेहमीच्या बघण्यातले उदाहरण. म्हणजे त्या इंद्रियामधे निर्माण झालेल्या दोषामुळे वासाची संवेदना मेंदूपर्यंत जात नाही. स्निग्धता इंद्रियांना किती आवश्यक आहे हे समजण्या साठी एक वाक्प्रचार आपण लहान पणा पासून ऐकत आलो आहोत, “डोळ्यात तेल घलून पहा, किंवा डोळ्यात तेल घलून लक्ष दे” म्हणजेच ज्ञानेंद्रियांची शक्ती किंवा कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी तेल किंवा तुपा सारखा स्निग्ध पदार्थ किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदात तुपाच्या गुणधर्मां विषयी फार सुंदर वर्णन केले आहे, ते असे:

“शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशर, जेष्टमध, अश्वगंधा सारख्या वनस्पतींचा अर्क गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. हे नस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर करणे योग्य आहे. ह्या वेळी केल्याने अधिक फायदा होतो. नाकात थेंब टाकल्या नंतर ५ मिनिटे आडवे पडून राहावे. कधी कधी हे औषधी तूप घशात उतरल्या सारखे जाणवते. त्यावर घोटभर कोमट पाणी प्यावे. मेंदूची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच आकलन शक्ती चोख राहते व त्या मधे काही अडथळा न येता विषयांचे आकलन सहज होते.

दुसरी पायरी: ज्ञान योग्य प्रकारे साठवण्या करिता आवश्यक अशी रचना मेंदूच्या पेशींमध्ये घडवून आणण्याचे कार्य ह्या मुळे होते. ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, अश्वगंधा सारख्या वनस्पतींमुळे मेंदूच्या पेशींमधील प्रथिनांचे संहनन सुधारते असे शास्त्रीय प्रयोगां मधे आढळून आले आहे. वाचनालयात नवीन पुस्तकांची भर पडली तर कपाटांची संख्या वाढवावी लागते त्याच प्रमाणे अभ्यास वाढू लागला की मेंदूच्या क्षमते मधे वाढ करावी लागते. सध्या बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक सर्व औषधे ह्याच प्रकारे कार्य करतात. ह्या औषधांचा उपयोग होण्याची सुरुवात साधारणतः १५ दिवसांत होते. हा फरक थर्मोमीटर ने ताप मोजण्या इतका सहज मोजता येत नही हे खरे पण मेंदूच्या क्षमते मधे वाढ कशी होते हे देश-विदेशी झालेल्या असंख्य प्रयोगांमधे निर्विवाद पणे सिद्ध झाले आहे. शिवाय दीर्घकाळ पोटात घेऊन काही दुष्परिणाम होत नाही असे अभ्यासकांचे ठाम मत आहे. ह्या वनस्पतींचे इतर अनेक गुण आहेत. रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण सुधारते, रोग-प्रतिकार शक्ती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते, कॅल्शियमची झीज भरून निघते, स्टॅमिना वाढतो, जखमा लवकर भरून निघतात, केसांमधील मेलॅनिन वाढते त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते. बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन घेतांना मात्र त्यामधील घटकांचे प्रमाण योग्य आहे ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात घटक असण्यामुळे अपेक्षित गुण ठराविक कालावधी मधे मिळू शकत नाही. मुलांसाठी उत्पादन घेतांना चवीचा विचार करणे आवश्यक आहे. ह्या सर्व वनस्पती चांगल्याच कडू असतात त्यामुळे मुले नियमित पणे घेतील की नाही? नियमित पणे घेण्यासठी आवडीची चव आणि स्वाद असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तोंड वाकडे करीत कसेतरी घशाखाली ढकललेल्या औषधाचा उपयोग जेमतेमच होईल. मुलाने आपणहून मागणी करावी अशा छान छान चवींची उत्पादने आता सहज मिळू लागली आहेत.

सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी: केलेला अभ्यास बरोबर योग्य वेळी आठवणे ह्याला स्मरणशक्ती म्हणतात. स्मरणशक्तीची यंत्रणा मेंदूच्या विशिष्ट भागातून नियंत्रित केली जाते. त्याला योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नाकाच्याच मार्गाचा उपयोग होतो. फीट आल्यावर कांदा फोडून नाकाजवऴ धरतात व त्याच्या उग्र वासाने बेशुध्द अवस्थेतून झटकन शुध्द येते. विशिष्ट वास घ्राणेंद्रिया द्वारे घेण्यामुळे मेंदूतील स्मरणयंत्रणा कार्यरत होते. ह्या विषयी जर्मनी मधे काही संशोधकांनी प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या एका समूहाला एक चाचणी प्रश्नसंच देऊन एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली. झोपेत असतांना त्या खोलीत विशिष्ट सुगंधाची रात्री ४/५ वेळा फवारणी केली. त्या त्या वेळी मेंदूचा एफ् एम् आर् आय् (fMRI) स्कॅन घेतला. तेव्हां मेंदूतील हिपोकॅम्पस ची क्रिया अधिकच गतिमान होते असे लक्षात आले. दुसरा दिवस उजाडल्या नंतर त्यांची परीक्षा घेतली त्यावेळी त्यांना ९७ % उत्तरे अचूक सांगता आली. ज्या खोलीत अशी फवारणी केली नव्हती त्यांची फक्त ८४ % उत्तरे अचूक आली. ह्या वरून आपल्याला लक्षात येते की विशिष्ट वासामुळे मेंदूतील स्मरण शक्ती अधिक कार्यरत होते. ह्या संशोधनावर आधारित वेखंड, जटामांसी, वाळा इ. सुगंधी वनस्पतीं पासून एक औषधी अगरबत्ती तयार केली. अभ्यास करतांना व रात्री झोपतांना खोलीत ही अगरबत्ती लावावी. हा उपाय करण्याने अभ्यास केलेला विषय मेंदूतील स्मरणयंत्रणेमध्ये पक्का बसतो व योग्य वेळी आठवण करून देण्यासाठी मदत करतो.

देवाची भक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार: देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे समजणे आपल्याला नक्कीच आवडेल. कॉर्टिझॉल नामक एक द्रव-पदार्थ (हॉर्मोन) भीती मुळे शरीरात निर्माण होतो आणि जेवढा अधिक कॉर्टिझॉल निर्माण होईल तेवढा तो मेंदूच्या पेशींना मारक किंवा घातक असतो हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिध्द झाले आहे. लहान मुलाला उंच फेकल्यावर तो हसतो कारण त्याला खात्री असते की आपल्याला वरती फेकणारा जो कोण आहे तो आपल्याला खाली पडू देणार नाही, आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळे नकळतणे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ज्याने कोणत्याही संकट किंवा अडचणीच्या वेळी निर्माण होणारी भीती व त्याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलचा आघात कमी होतो. अर्थात, मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ह्या प्रकारे सहज टाळता येतो. घरातून बाहेर प्रवासाला जातांना देवाला आणि वडील माणसांना नमस्कार करण्यामागे हाच उद्देश होता. पूर्वी चांगले रस्ते, सुरक्षित वाहाने नव्हती. प्रवासासाठी बैलगाडी किंवा घोडे वपरले जात. शिवाय पाऊस, वादळ, खान-पान, जंगलातील प्राणी अशा अनेक संकटांचा सामना करण्याचे धैर्य फक्त देवभक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळेच मिळू शकते. संकट प्रसंगी तातडीचा नेमका आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ह्या एकाच गोष्टीमुळे शक्य होते.

नियमित व्यायामाचे महत्त्व: कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.

बुध्दीचा व्यायाम: नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुद्रुढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’.

आहारा बद्दल थोडेसे: मनुष्य शरीराची रचना घडवतांना निर्मात्याने फक्त शाकाहाराच्या पचनासाठी योग्य अशी यंत्रणा घडवली आहे. त्यामुळे ज्यांना मांसाहाराची आवड असेल त्यांनी आठवड्यातून एक वेळा पेक्षा जास्त मांसाहार करू नये. आयुर्वेदात पंचखाद्य नावाचा एक चविष्ट पदार्थ वर्णन केला आहे. खारीक, खजूर, खोबरं, खसखस आणि खडीसाखर अशा ‘ख’ ने सुरुवात असलेल्या पाच गोष्टी एकत्र करून झकास चवीचा हा पदार्थ मधल्या-सुटी साठी फार आवडीचा मेनू होऊ शकतो. हा नुसता ‘सुका-मेवा’ नव्हे तर खरोखर ‘बौध्दिक-मेवाच’ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा